औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू ( News) करण्याबाबतचा निर्णय पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी याबाबत माहिती दिली असून, 15 डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं पांडे म्हणाले आहेत. राज्यात 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेत औरंगाबाद महानगरपालिकेने 1 डिसेंबरऐवजी 10 डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत आज बैठक होणार होती. मात्र आता शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय आणखी पुढे ढकलण्यात आला असून, 15 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाणार आहे. औरंगाबादच्या ग्रामीण भागात 1 डिसेंबरपासूनच पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र महापालिका हद्दीत अजूनही शाळा बंदच आहे. त्यात गेली तीन दिवस ग्रामीण भागात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नसून, शहरात मात्र रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे आणखी पुढील पाच दिवस परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबततचा निर्णय घेण्याचा प्रशासनाने ठरवलं आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून ऑफलाईन पद्धतीने सुरु झाल्या होत्या. प्रत्येक वर्षीप्रमाणे पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत शासनाच्या परिपत्रकानुसार सुटी जाहीर करण्यात आली होती. परंतु नंतरच्या काळात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने मिळू लागले. तसंच ओमायक्रॉनच्या भीतीने पालकही धास्तावून गेले. विद्यार्थ्यांना शाळेत पाठण्यासाठी त्यांनी असमर्थतता दर्शवली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pCs2n6