औरंगाबाद : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या आरोग्य भरती पेपर फुटीनंतर आता म्हाडाच्या पेपर फुटीचे पाळेमुळे थेट औरंगाबाद जिल्ह्याशी जोडलेली असल्याचं समोर आलं आहे. म्हाडाच्या पेपरफुटीचा मुख्यसूत्रधाराकडे औरंगाबादच्या दोन कोचिंग क्लासेसच्या तीन प्राध्यापकांनी सर्वाधिक पेपरची मागणी केली होती. विशेष म्हणजे आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणातसुद्धा औरंगाबाद येथून काही आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीचं प्रकरण ताज असताना अचानक आदल्या रात्री म्हाडाची परीक्षा रद्द करण्याची घोषणा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. म्हाडाचे पेपर फुटल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे ज्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीला म्हाडाच्या परीक्षेचं कंत्राट देण्यात आलं होतं, त्याचा संचालक प्रतिशी देशमुख हाच मुख्य सूत्रधार निघाला. देशमुखकडे सर्वाधिक पेपरची मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील कोचिंग क्लासेसच्या प्राध्यापकांकडून करण्यात आली होती. औरंगाबाद कनेक्शन... म्हाडाच्या पेपरफुटीचं कनेक्शन थेट औरंगाबादशी असल्याचं समोर आलं असून, शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या 'द टार्गेट करिअर पॉइंट'चा अजय नंदू चव्हाण व सक्षम अकॅडमीचा संचालक कृष्णा शिवाजी जाधव, अंकित संतोष चनखोरे यांना या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी केले आहे. तर आरोग्य विभागाच्या पेपर फूटीप्रकरणीसुद्धा दोन आरोपींना औरंगाबादमधून अटक करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात आता पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EPdiaT