सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार हे सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. शिवशाही शब्द शिवसेनेनं केव्हाच सोडला आहे. सेनेचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून जे काही सुरू आहे ती बेबंदशाही असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेवर देखील जोरदार टीका केली. 'शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेला कुडतडलं तर सामान्य माणसाचे डोळे आता उंदीर कुडतडत आहेत. शिवसेनेने सामान्य माणसाचा जीव टांगणीला लावला आहे. सायन हॉस्पिटलमधे मृताच्या शेजारी रूग्णांवर उपचार केले जात आहेत तर राजावाडीमध्ये आयसीयूमधे रूग्णांचे डोळे उंदीर खात आहेत. ही आज मुंबईची आणि महानगरपालिकेची स्थिती आहे' असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. इतकंच नाहीतर ते पुढे म्हणाले की, ८० हजार कोटीचं फिक्स डिपॉझिट, एक हजार दोनशे करोडच्यावर आरोग्याचं बजेट आहे. मग या बजेटला कोण कुडतडतय? असा सवाल करत हे पाप शिवसेनेचं असल्याची गंभीर टीका शेलारांनी केली आहे. 'प्रवीण दरेकरांचं काम चांगलं' या पत्रकार परिषदेमध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या बँक गैरव्यवहार प्रकरणीही आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर विरोधी पक्ष नेते म्हणून चांगलं काम करत आहेत. म्हणून त्यांचा राजीनामा मागीतला जातोय. बँकेच्या घोटाळ्याच्या कुठल्याही चौकशीला दरेकर किंवा मुंबई बँक कुठेही मागे राहिली नाही. चौकशी करावी त्यात लपवण्यासारखं काही नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर, सत्ता तुमच्याकडे आहे, त्यामुळे राजीनामे कसले मागता. चूक पकडता येत नाही म्हणून त्याचा राजकीय मुद्दा करा असा राजकीय खेळ केला जात आहे. दरेकरांनी कालही चांगलं काम केलं आणि आजही चांगलं काम करत आहेत असा विश्वास शेलारांनी व्यक्त केला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TVERN6