लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुका तसा दुष्काळी सावली असलेला भाग. शिवली गावशिवारात पाण्याचे नेहमी दुर्भिक्ष होते. पण राज्य शासन भारतीय जैन संघटना आणि ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून जलसंधारणाच ६ किलोमीटरचं काम झालं असून पाण्याच्या संसाधनातून किमान १० कोटीच्या अर्थकारणात बदल झाला आहे. शिवली गाव हे औसा तालुक्यातील भूकंपग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भाग आहे. दरवर्षी पाण्याची टंचाई हा नेहमीचा विषय आहे. शेतीला पाणी नसल्याने इथं अनेक शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन केलं. पण गेल्या काही वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्य शासन आणि भारतीय जैन संघटना आणि गावकऱ्यांनी एकत्रितपणे गावशिवारातील ओढे-नाले याचं रुंदीकरण केलं. जवळपास ६ किलोमीटर इतकं ४० फूट रुंद १५ फूट खोल रुंदीकरण आणि खोलीकरण केलं. याचा परिणाम म्हणजे शिवली आणि बिरवली या दोन गावाच्या शिवारात पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. शिवारात २ हजार एकर उसाच्या क्षेत्रात वाढ होऊन आता ६ हजार एकर क्षेत्र झाले तर सोयाबीन आणि अन्य शेतमाल पिकांच्या उत्पादनात कमालीचा बदल झाला आहे. यापूर्वी गावात एकूण शेतमाल उत्पादनातून जवळपास ५ कोटी रुपयांचं उत्पादन घेतलं जात होतं. आता तेच उत्पादन १० कोटींच्या घरात पोहचलं आहे. दुष्काळाशी झगडणारं शिवली गाव ग्रामस्थांच्या एकजुटीने आता समृद्ध झालं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dE070F