सतीश घाटगे । कोल्हापुरातील एका महिलेनं भंगार गोळा करणाऱ्या महिलेला आपल्याकडील तांदळाची पिशवी दिली. ही पिशवी घेऊन भंगारवाली निघून गेली. पण, या पिशवीत आपण साठवलेले ७० हजार रुपये होते, हे पिशवी देणाऱ्या महिलेच्या लक्षात आलं. तिनं लगेचच भंगारवालीचा शोध सुरू केला. पण ती न सापडल्यामुळे तिने थेट पोलिस ठाणे गाठले. शनिवार पेठेत रविवारी ही घटना घडली. कालच्या सुट्टीच्या दिवशी या परिसरात काही महिला भंगार गोळा करत होत्या. एका महिलेने त्यांना घरात शिल्लक असलेले तांदूळ देऊ केले. भंगारवाल्यांनी महिलांनी तांदूळ स्वीकारण्यास होकार दिल्यानंतर संबंधित महिलेने भंगार गोळा करणाऱ्या महिलेला तांदळाची पिशवी दिली. तांदूळ घेऊन महिला निघून गेली. दरम्यान, तांदूळ देणाऱ्या महिलेच्या लक्षात आले की आपण साठवलेले ७० हजार रुपये तांदळाच्या पिशवीत आहेत. घाबरलेल्या महिलेने भंगार गोळा करणाऱ्या महिलेचा शोध घेतला पण ती सापडली नाही. अखेर तिने लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे गाठले. तिथे पोलिसांकडे तक्रार केली. वाचा: पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भंगार गोळा करणाऱ्या महिलेचा शोध सुरू झाला. संबधित महिला सायबर कॉलेज परिसरात राहते अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी भंगार गोळा करणाऱ्या महिलेचे घर शोधले. त्यांनी भंगार गोळा करणाऱ्या महिलेला तांदळाच्या पिशवीबाबत विचारणा केली असता तिने तांदळाची पिशवी न उघडता डब्यात ठेवल्याचे सांगितले. संबधित महिलेने तांदळाची पिशवी उघडलीच नव्हती. पोलिसांनी सर्वांसमक्ष तांदळाची पिशवी खोलली असता त्यामध्ये ७० हजार रुपये मिळाले. भंगार गोळा करणाऱ्या महिलेने रोख रक्कमेसह तांदळाची पिशवी पोलिसांना दिली. पोलिसांनी शनिवार पेठेतील महिलेला तिची रक्कम परत केली. भंगार गोळा करणाऱ्या महिलेच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी तिचे कौतुक केले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yiVEK0