Type Here to Get Search Results !

राज ठाकरे: करिश्म्यात घुटमळणारा प्रवास

सचिन परब ' यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र!' ही आठ कॉलमी दणकट हेडलाइन २७ नोव्हेंबर २००५च्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या मुंबई शहर आवृत्तीत छापून आली. या बातमीने महाराष्ट्र हादरला, विशेषतः शिवसेना. शिवसेनेच्या नेत्यांनी सकाळीच ठिकठिकाणी पेपर जाळले. एक मोर्चा 'मटा'च्या कार्यालयात निवेदन देऊनही गेला. परंतु 'मटा'ची हेडलाइन दुपारपर्यंत ब्रेकिंग न्यूज ठरली होती. घरासमोर जमलेल्या गर्दीत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. 'माझं भांडण माझ्या विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे...' राज यांच्या प्रत्येक शब्दाला जादुई प्रतिसाद मिळत होता. 'जब तक आखऱी सांस हैं, हम तुम्हारे साथ हैं'च्या घोषणांनी वातावरण भारलेलं होतं. आज १६ वर्षांनी मागे वळून बघताना पस्तिशीतले राज आणि त्यांचे सहकारी डोळ्यांसमोर दिसतात. सोबत त्यांचे उत्साहाने ओथंबलेले चेहरे आणि स्वप्नांनी चमकणारे डोळे. आता त्यातलं काही उरलं नाही. सहकाऱ्यांपैकी अनेकांनी राज यांच्यासोबतची 'आंखऱी सांस' घेऊन काळ लोटलाय. सोबत उरलेत ते संदर्भहीन झालेत. १९ मार्च २००६च्या भव्य मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुहूर्तमेढ रचताना राज ठाकरे यांनी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण केलं, तेव्हा असं होईल असं वाटलं नव्हतं. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची गोष्ट करणाऱ्या राज यांच्या पक्षाचा कुणाला हेवा वाटावा अशी परिस्थिती नाही. सुरुवातीला विधायक विकासाची चर्चा करून कार्यकर्ते पेटत नाहीत आणि मतंही मिळत नाहीत हे लक्षात आल्यावर राज यांनी सोपा मार्ग शोधला. उत्तर भारतीय नावाचा शत्रू उभा केला. २०१२मध्ये मनसेचे १३ आमदार, नाशिकचा महापौर, मुंबईत २८ नगरसेवक आणि राज्यभरात दोनशेहून जास्त लोकप्रतिनिधी होते. 'तुमने अपुन को मारा, आपूनने सिर्फ एक मारा, लेकिन सॉलिड मारा के नहीं?' ही त्यांची प्रतिक्रिया तेव्हा चमकदार ठरली, परंतु त्याची चमक फार काळ टिकली नाही. राज ठाकरेंच्या पाठिराख्यांमध्ये प्रामुख्याने शिवसेनेने स्थान नाकारलेले जुने शिवसैनिक, करिश्म्याने भारावलेला नवतरुण आणि महिला होत्या. तसंच तेव्हाच्या निष्प्रभ नेतृत्वामुळे कंटाळलेला भाजपचा पारंपरिक अभिजन मतदारही होता. मनसेच्या धडाक्यामुळे भाजपच्या खासदारांची संख्या आठवर आली होती आणि राम कदम यांनी पूनम महाजनांना घाटकोपरमध्ये हरवलं होतं, यावरून ते लक्षात येऊ शकतं. परंतु राज ठाकरेंचा गुजरात दौरा, मुंबई महापालिका पक्षगटनेतेपदी दिलीप लांडे यांच्या जागी संदीप देशपांडे यांची निवड, नाशिक महापालिकेत भाजपशी युती मोडणं, तेलकट बटाटेवडे आणि चिकन सूपचं वादग्रस्त वक्तव्य अशा गोष्टी अंगलट आल्या. यशाच्या धुंदीत असतानाच राज यांच्या नकळत मनसेची घसरण सुरू झाली. एकेक पाठीराखा, समाजघटक सोडून जाऊ लागला. मराठवाड्यातील मनसेचा एक पदाधिकारी सांगतो, 'राजसाहेबांनी विनाकारण इंदू मिल स्मारकाला विरोध केला, तेव्हा आमच्या झेंड्यातला निळा रंग गेला. मुस्लिमांच्या विरोधात प्रतिमोर्चा काढल्यावर हिरवा रंग गळाला. मराठा आरक्षणाला विरोध केला तेव्हा भगवा रंगही राहिला नाही...' सन २०१४च्या निवडणुकीत मोदी त्सुनामीने मनसेला मोठा फटका दिला. त्यानंतरच्या निवडणुकांत अपयश ही औपचारिकता उरली. त्यामुळे झेंडा बदलून, रेल्वे इंजिनाची दिशा बदलून किंवा 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदींवर टीका करूनही हाताला काही लागलं नाही. ईडीच्या नोटिशीनंतर शांत बसल्याने उरलीसुरली विश्वासार्हताही लयाला जाऊ लागली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गाने गेल्यावर आपल्याला यश मिळालं, हे लक्षात आल्यानंतर राज त्या कार्यपद्धतीच्या प्रभावात अडकले. बदललेल्या काळात त्या कार्यपद्धतीचा नवा आविष्कार करण्याऐवजी त्यांचं इंजिन जुन्या काळातच गोल-गोल फिरत राहिलं. परंतु बाळासाहेबांनी वैयक्तिक करिश्म्याची ऐट सांभाळताना संघटन बांधणीसाठी शिवसैनिकांना कार्यक्रम देण्यात कधी कुचराई केली नव्हती. धोरणांमधली धरसोड प्रभावी वक्तृत्वाने शिवसैनिकांच्या गळी उतरवली होती. माध्यमांच्या प्रेमात अडकून ते वास्तवापासून दूर गेले नव्हते. राज यांना अजूनपर्यंत तरी यातलं काही जमलेलं नाही. उलट वैयक्तिक करिश्मा नसल्याने उद्धव ठाकरे यांची सगळी मदार संघटना बांधणीवरच होती. त्यामुळे बाळासाहेबांच्या पश्चातही शिवसेनेचे नेते मनसेत गेले नाहीत. उलटपक्षी मनसेतील काही जण शिवसेनेत आले. सोडून जाणाऱ्या अनेकांनी त्यांचा नवा विठ्ठल बडव्यांमध्ये अडकल्याचे आरोप केले. त्यातून उदय, यश आणि पतनाचं एक वर्तुळ पूर्ण झालं. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पात्र वारसदार नाहीत, मीच आहे, याच दाव्यावर राज यांचं बंड आणि मनसे उभी राहिली होती. आज उद्धव यांनी मुख्यमंत्रिपद मिळवून स्वत:ची क्षमता सिद्ध केली असल्यामुळे राज यांच्या बंडाचा पायाच हादरला आहे. परंतु म्हणून राज यांना मोडीत काढण्याचा मूर्खपणा कुणी करू नये. स्वतःच्या अजेंड्यावर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून काढू शकेल असा अन्य प्रभावी नेता लगेच डोळ्यांसमोर येत नाही.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31tCaGv

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.