सचिन जाधव । राष्ट्रीय ग्रामीण पेयजल नळपाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन राज्यसभा खासदार यांनी नुकतंच केलं. सातारकरांसाठी हा आनंदाचा दिवस असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. २० वर्षांपूर्वीची एक आठवण सांगत त्यांनी यावेळी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना अप्रत्यक्षपणे टोला हाणला. त्यामुळं शशिकांत शिंंदे विरुद्ध शिवेंद्रराजे वादानंतर आता दोन्ही राजांमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हं आहेत. वाचा: आगामी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं खासदार उदयनराजे भोसले यांनी विकासकामांचा व उद्घाटनाचा धडाका लावला आहे. याचाच भाग म्हणून नव्या योजनेचं उद्घाटन त्यांनी केलं. २० वर्षांपूर्वी अशाच पद्धतीच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला काही जणांनी विरोध केला होता. तेव्हाच कण्हेर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं काम झालं असतं तर कमी पैशात ही योजना झाली असती. सुमारे १८ गावांना आणि ३५ हजार नागरिकांना याचा फायदा झाला असता. मात्र, विरोधामुळे काही भागातले सातारकर पाण्यापासून वंचित राहिले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 'श्रेय वादासाठी असं नुकसान पुन्हा होणार नाही याची काळजी विरोधकांनी घ्यायला हवी. चांगल्या कामांना विरोध करू नका, असं आवाहनही त्यांनी याप्रसंगी केलं. त्यांचा रोख दिवंगत अभयसिंहराजे भोसले आणि विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर होता. आता झालेल्या योजनेतून सुमारे १० हजार लोकांना पाणी मिळणार आहे. पुढील ४५ वर्षे ही योजना सर्वांसाठी व्यवस्थित चालेल, अशा पद्धतीने बनविली आहे. शाहुपुरी, करंजे आणि आजूबाजूच्या परिसराला याचा फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं. वाचा: शाहूपुरीसह १८ गावांसाठी कण्हेर धरणातून पाणी पुरवठा करण्याची संकल्पना उदयनराजे यांनी २० वर्षांपूर्वी मांडली होती. मात्र, त्यानंतर त्यांची सत्ता गेली. या योजनेला दिवंगत अभयसिंहराजे यांनी त्यावेळी विरोध केला होता. त्यामुळे ही योजना रखडली. वीस वर्षांपूर्वी या योजनेचा खर्च फक्त १६ कोटी रुपये होता. मात्र, आताच्या योजनेचा अंदाजित खर्च ४२ कोटी रुपये असून फक्त शाहूपुरी आणि करंजे याच भागांना पाणीपुरवठा होणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DLAipQ