: बारामतीतील विविध निवडणुकांमध्ये कायमच काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र यंदाच्या सहकारी बँकेच्या निवडणुकीत ३ उमेदवारांनी शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज माघारी न घेण्याची भूमिका घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग खडतर झाला होता. अखेर पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आणि अखेरच्या क्षणी हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असलेल्या बारामती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर यशस्वी झाले आहेत. () निवडणुकीत १०३ पैकी राष्ट्रवादीपुरस्कृत सहकार प्रगती पॅनलच्या १३ उमेदवारांच्या विरोधात तीन उमेदवारी अर्ज राहिल्याने निवडणूक होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घडलेल्या घडामोडीनंतर हे तीनही अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे बारामती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामध्ये छानणीनंतर राहिलेल्या १०३ अर्जांपैकी ८७ जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यात दोन जागा बिनविरोध झाल्या. मात्र तीन उमेदवारी अर्ज राहिल्यामुळे तेरा जागांसाठी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचं चित्र होतं. मात्र सायंकाळी उशिरा डॉ. विजय भिसे यांचे दोन आणि त्यांची कन्या प्रतीक्षा भिसे यांचा एक असे तीन उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. कॉँग्रेसचे पदाधिकारी डॉ. विजय रामचंद्र भिसे यांनी खुल्या आणि अनुसुचित जाती जमाती प्रवर्गात आपली उमेदवारी कायम ठेवली होती. तसंच महिला राखीव प्रवर्गातून डॉ. भिसे यांच्या कन्या प्रतीक्षा भिसे यांनी आपला अर्ज ठेवला होता. तीन अर्ज राहिल्याने तब्बल १३ जागांवर निवडणूक होणार होती. त्यामुळे हे अर्ज माघारी काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांची मनधरणी केली. शेवटी तीनही जागांवरील उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे सायंकाळी उशिरा ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. दरम्यान, बारामती सहकारी बँकेवर उपमुख्यमंत्री यांचं एकहाती वर्चस्व आहे. नुकत्याच या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना गडबड न करण्याची तंबी दिली होती. मंगळवारी या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पॅनल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीकडील इच्छुकांनी आपले अर्ज माघारी घेतले. मात्र आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी डॉ. भिसे यांच्याशी संबंधित तीन अर्ज राहिल्याने राष्ट्रवादीपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र अखेर ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DCnOAE