सोलापूर: गेल्या ६० वर्षात कधी एसटीचा सरकारमध्ये विलीनीकरण मुद्दा समोर आला नव्हता. मात्र आता विरोधकांकडून मुद्दामहून हा प्रश्न चिघळवला जात आहे. राज्यातील विरोधी पक्ष विविध मुद्दे काढून राज्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका उपमुख्यमंत्री () यांनी केली आहे. ते पंढरपुरात बोलत होते. आज कार्तिक यात्रेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. एसटीचे राज्यसरकरमध्ये विलनीकरण केले तर राज्यातील सर्वचं महामंडळाचे कर्मचारी देखील अशी मागणी करतील असे सांगत अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, कोतवाल,पोलीस पाटील हे देखील मागणी करु शकतात. त्यामुळं सरकारच्या अडचणीत वाढ होईल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. राज्य सध्या तरी पेट्रोल डिझेल वरील कर कमी नाही. त्यामुळं राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अजून आर्थिक घडी नीट बसलेली नसून पगार, पेन्शन आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या वरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही. तरीही येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी व राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. राज्य, देश आणि जगातील कोरोनाचे संकट कायमचे दूर व्हावे, तसेच सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठल चरणी घातले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30mvIAy