अहमदनगरः ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप प्रवाशांचे हाल करणारा तर खासगी वाहतूकदारांच्या पथ्यावर पडला आहे. एसटी बस बंद असल्याने नाइलाजाने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहेत. त्यातून प्रवाशांची लूट होत असून नगरहून पुण्याला जाण्यासाठी काल रात्री अनेकांना पाचशे रुपये भाडे मोजावे लागल्याचे सांगण्यात आले. इतर ठिकाणी जाण्यासाठीही जादा भाडे द्यावे लागत आहे. () एसटी महामंडाळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दिवाळीच्या आधी तुरळक गाड्या सुरू होत्या. त्यामुळे नागरिक सुट्टीसाठी गावी आले. मात्र, दिवाळी संपताच शनिवारी रात्रीपासून संपाची तीव्रता वाढविण्यात आली. सर्वच संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे जवळपास सर्वत्र एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहक-चालक आगार परिसरात धरणे-ठिय्या देत आहेत तर सुट्टीहून परतण्यासाठी प्रवाशी बसस्थानकात ताठकळत उभे आहेत. बंद नसलेल्या एखाद्या आगाराची गाडी आली की त्यामध्ये जागा पकडण्यासाठी धावपळ उडत आहे. जागा मिळाली नाही, तर दुसरी गाडी येणार की नाही, याची शाश्वती नाही. बसस्थानकात यासंबंधी कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. वाचाः त्यामुळे प्रवासी असाह्य झाले आहेत.याचा गैरफायदा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी उठविल्याचे दिसून येते. करोना काळात झालेला तोटा भरून काढण्याची नामी संधी म्हणूनच याकडे अनेक खासगी वाहतूकदार पहात आहेत. नोकरीच्या गावी परतण्याची प्रवाशांची आगतिकता आणि नाइलाज लक्षात घेता त्यांनी अचानक अघोषित भाडेवाढ केली आहे. प्रवाशांची परिस्थिती पाहून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे. रविवारी दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत नगरहून पुणे, मुंबई आणि औरंगाबादला परतणाऱ्यांची संख्या मोठी होती. या संधीचा गैरफायदा उठवत खासगी वाहतूकदारांनी पुणे किंवा औरंगाबादसाठी अनेक प्रवाशांकडून पाचशे रुपये भाडे उकळण्याच्या तक्रारी आहेत. रात्रीची वेळ, दुसऱ्या दिवशी कामावर पोहचण्याची अवश्यकता आणि एसटीची खात्री नाही, अशा कात्रीत अडकलेल्या अनेक प्रवाशांनी नाइलाजाने हे वाढीव भाडे देऊन प्रवास केल्याचे सांगण्यात आले. वाचाः सोमवारीही सुरूच आहे. सकाळपासून बहुतांश आगारातून गाड्या सुटल्याच नाहीत. तारकपूर आगारासह जिल्ह्यातील श्रीरामपूर, शेवगाव, कर्जत, जामखेड अशा सात आगारातील चालक, वाहक आणि इतर कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची अद्यापही गर्दी आहे. स्थानकात बस येत नसल्याने रस्त्यावर उभे राहून मिळेल त्या खासगी वाहनाने पुणे गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे. खासगी वाहतुकीचे प्रवास भाडेही परिवहन विभागातर्फे निश्चित करून दिले जात असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. प्रवासीही अधिकृतपणे तक्रार करण्याच्या मनस्थितीत नाहीत. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/300LIbH