म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाने स्थानिक पातळीवर कोणत्याही इतर पक्षांशी तडजोड करू नये, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सर्वांना दिला आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिका निवडणुकांसह, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या एकट्याने लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या इतर अनेक नेत्यांनी या अगोदर स्वबळाचा नारा दिला होता. परंतु काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. या संदर्भात पटोले यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना पत्र लिहून याविषयी सूचना केल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा, असे या पत्रात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत स्थानिक पातळीवर परस्पर निर्णय घेऊ नयेत. कोणत्याही तडजोडी करू नये, असे निर्देशही या पत्रात देण्यात आले आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुका आणि इतर निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसने आगामी सर्व निवडणुका या स्वबळावर लढवाव्यात, असे काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे मत आहे. त्याच दृष्टिकोनातून काँग्रेस नेत्यांची एक बैठकदेखील नुकतीच पार पडली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना हे पत्र लिहिले आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे राज्यात आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका रंगतदार होतील, असे मानले जात आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CKwYuN