अहमदनगर : राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठल्याने आरोपप्रात्यारोप सुरू झाले आहेत. दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे, तर राज्य सरकारने कर कमी केले तर पेट्रोल स्वस्त होईल, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशीच मागणी भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी केली. त्यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. इंधनावर लावल्या जाणाऱ्या करांचा हिशोब देतानाच 'राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून किंवा रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत', असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. इंधन दरवाढीची चर्चा सुरू झाल्यानंतर खासदार मेंढे यांनी राज्य सरकारवरच आरोप केला. यावेळी ते म्हणाले की, 'इंधनाची ही दरवाढ केवळ केंद्र सरकारमुळे झाली असे म्हणने चुकीचे आहे. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकार जास्त कर लावते. राज्य सरकार २५ टक्के कर आणि १० टक्के असे एकूण ३५ टक्के कर आकारणी करते. त्यामुळे राज्य सरकारचाही या दरवाढीत तेवढाच सहभाग आहे. राज्य सरकारने स्वतः त्यांचे कर कमी केले तर दरवाढ कमी होईल. राज्य आणि केंद्र सरकार या दोघांनीही त्यांचे कर कमी करावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा' अशी मागणी खासदार मेंढे यांनी केली आहे. यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी म्हटले आहे, 'राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी राज्यातील भाजपच्या एका नेत्याने केली. पण २०१४ च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी २०१४ च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज ३५० टक्क्यांनी वाढला आहे. आज पेट्रोलवर केंद्राचा ३२.९० रुपये तर राज्याचा २८.३५ रुपये कर आहे. असे असताना या नेत्यांचे गणित कळत नाही.' 'राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून, रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटी रुपयांची मदतही मिळत नाही. हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे' असा टोलाही पवार यांनी मेंढे यांचे नाव न घेता लगावला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RQ0huA