औरंगाबाद : करोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूमुळे जगभराची चिंता वाढली आहे. सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या नवीन विषाणूचा धोका पाहता दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी केली जात असून, विशेष लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, औरंगाबाद इथे शिक्षणासाठी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या विद्यार्थीचीसुद्धा करोना चाचणी करण्यात आली होती. ज्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतून शिक्षणासाठी औरंगाबाद आला आहे. ज्याची मुंबईसह औरंगाबाद विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. ज्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच विमानतळवर विदेशातील प्रवाशांना क्वॉरंटाइन करण्याचे कोणतेही आदेश नसल्याने रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे या विद्यार्थ्याला तेथून सोडून देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्याची पुन्हा एकदा चाचणी केली, ज्याचा रिपोर्टही निगेटिव्हच आला आहे. पण तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या विद्यार्थ्याला पुढील सात दिवस हॉस्टेलमध्ये क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. ओमायक्रॉनचा धोका पाहता देशभराची प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. खास करून विदेशातून येणाऱ्या लोकांची माहिती घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. मात्र, ज्या देशात ओमायक्रॉनचे पहिल्यांदा रुग्ण आढळून आले त्या दक्षिण आफ्रिकेतील व्यक्ती औरंगाबाद शहरात विमानाने आल्यानंतर त्याची माहिती विमानतळ प्रशासनाने महापालिकेला कळवने अपेक्षित होते. पण विमानतळ प्रशासनाने ही माहिती मनपाला कळवलीच नाही.तर मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर ही बाब समोर आली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZNhpow