औरंगाबाद : करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या प्रसाराची धास्ती घेऊन महापालिका प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसात विदेशातून शहरात आलेल्या नागरिकांची माहिती गोळा केली आहे. त्यांच्यापैकी १८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. दोन विदेशी नागरिकांचीही आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, त्यांच्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ते नागरिक दिल्लीला रवाना झाले आहेत. विदेशी नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका हद्दीतील २३ जणांपैकी १९ जण औरंगाबाद शहरातील आहेत. चार जण ग्रामीण भागातील व जिल्ह्याबाहेरील आहेत. १९ जणांपैकी १६ जणांची आरटीपीसीआर चाचणी आज (गुरुवारी) करण्यात आली, त्याचे अहवाल उद्या प्राप्त होणार आहेत. उर्वरित तीन जण बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून, ते औरंगाबादेत परतल्यावर त्यांची चाचणी केली जाणार आहे. त्या तीन जणांशी संपर्क साधला असता त्यांनी करोना चाचणी केल्याचे समजले,परंतु ते औरंगाबादेत परतल्यावर त्यांची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे, असे डॉ. जोगदंड म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या नऊ जणांच्या यादीमधील पाच जण महापालिका क्षेत्रातील, तर चार जण बाहेरगावचे आहेत. पालिका क्षेत्रातील पाच जणांपैकी दोन जण विदेशी नागरिक होते, त्यांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला व ते दिल्लीला रवाना झाले. उर्वरित तीन जणांपैकी दोन जणांची आरटीपीसीआर चाचणी आज करण्यात आली, त्याचा अहवाल उद्या प्राप्त होणार आहे. एक जणाची उद्या केली जाणार आहे. ग्रामीण भागातील दोघाजणांची आरटीपीसीआर चाचणीदेखील करण्यात आल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी जी. एम. कुंडलीकर यांनी सांगितले. त्यांचे चाचणी अहवाल उद्या प्राप्त होणार आहेत. -
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lv5fIL