उद्धव गोडसे । सांगली जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, कडेगाव, इस्लामपूर, वाळवा शिराळ्यासह परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतात पाणी साचल्याने ऊसतोडी रखडल्या आहेत, तर ऐन फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांच्या हंगामावर पाणी पडले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार हेक्टरवरील द्राक्षबागा बाधित झाल्या होत्या, तर आज पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे ३० हजार हेक्टरवरील द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी हबकले आहेत. गुरुवारी पहाटे अडीच ते सकाळी साडेआठपर्यंत सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात मोठा पाऊस पडला. सांगली जिल्ह्यातील पूर्व भागासह पूर्ण जिल्ह्यातील काढणीला आलेले आणि फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांचे पावसाने मोठे नुकसान झाले. तासगाव, पलूस, मिरज, कडेगाव परिसरात पावसामुळे ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असून, द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहे. कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सुरू आहे. सांगली शहरात मध्यरात्रीपासून पाऊसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वाचा: गेल्या महिनाभरातील अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे रोगाला बळी पडून, कुजून किंवा गळून मातीमोल झाली आहेत. अस्मानी संकटात जिल्ह्यात द्राक्षबागायतदार शेतकर्यांचे आतापर्यंत दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. उर्वरित ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील जवळपास आणखी दीड हजार कोटी रुपयांच्या द्राक्षांवर अवकाळी पावसाचे संकट आहे. पावसामुळे शेतात पाणी साचल्याने ऊस तोडींवरही परिणाम झाला आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32HIZ7I