जालना: जिल्ह्याच्या भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या आई व भावानेच पैसे घेऊन ३ वेळा करून दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तिच्या कुटुंबीयांनी पुन्हा चौथ्या वेळेस बळजबरीने विवाह लावून देण्याची तयारी सुरु केल्याचे समजताच पीडित मुलीने घरातून पळ काढत पोलीस ठाणे गाठले आणि आपली आपबिती कथन केली. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आई, १ भाऊ, ३ पतीराजांसह १२ नातेवाइकांविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माय लेकीच्या,बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे कळते आहे. भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह अंदाजे ३ वर्षांपूर्वी तिच्या आई आणि भावांनी जळगाव जिल्ह्यातील शेंदूर्णी तालुक्यातील एका मुलाशी पैसे घेऊन लावून दिला होता. तिथे एक महिना संसार करते न करते तोच तिच्या माहेरच्यांनी तिला परत आणले व पुन्हा सासरी पाठवलेच नाही. त्यानंतर ८ महिन्यांनी पुन्हा पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील एका व्यक्तीकडून पैसे घेऊन या मुलीचा दुसरा विवाह लावून देण्यात आला. तिथे तीन महिने राहिल्यानंतर तिच्या भावांनी तिला परत भोकरदनला आणले. त्यांनतर पुन्हा ५ महिन्यांनी भोकरदन शहरातील एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तिसरा विवाह लावला. त्याच्यासोबत पीडिता मुलगी औरंगाबाद येथे एक वर्ष राहिली. परंतु पतीसोबत वाद झाल्याने पीडिता मुलगी चार महिन्यांपूर्वी माहेरी भोकरदन येथे आलेली होती. वाचाः दरम्यान आई व भावांकडून पुन्हा चौथ्या लग्नाची तयारी सुरू होती. जळगाव जिल्ह्यातील पाहुणे पाहायला येणार असल्याचे तिच्या कानावर पडताच पीडित मुलीने चौथ्या लग्नाला विरोध केला. या कारणास्तव तिच्या भावाने तिला मारहाण केली. आता आपण लग्न केले नाही तर आपल्या जीवाला धोका असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर संपर्क केला. पोलिसांनी लगेच तिला भेटून चौकशी केली व पीडित मुलीच्या तक्रारीवरून आई, भाऊ, ३ पतीसह १२ नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EpWOpt