Type Here to Get Search Results !

पगारवाढीनंतरही एसटी संपाचा तिढा कायम! कर्मचारी विलिनीकरणावर अडले

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्री आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळात बुधवारी झालेल्या बैठकीत विलीनीकरणाऐवजी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामध्ये एसटीच्या पहिल्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा परब यांनी केली. मात्र, आंदोलक कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन २७ ऑक्टोबरपासून सुरू असून, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी गेले दोन आठवडे मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडले आहे. विलिनीकरण मुद्द्यावरून न्यायालयाने उच्च समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत राज्य सरकारने समेटाचा मार्ग काढत बुधवारी कामगारांच्या पगारवाढीची घोषणा केली. परिवहमंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा केल्यानंतर आंदोलन मागे घेतले जाईल, हा सरकारचा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला. त्याउलट, आझाद मैदान येथे जमलेल्या आंदोलक कर्मचाऱ्यांमधील रोष आणखी वाढला. 'आम्हाला विलीनीकरणच हवे' या मागणीचा पुनरुच्चार करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याआधी परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पगारवाढीविषयी सविस्तर माहिती दिली. विलीनीकरणासंदर्भात उच्च न्यायालयाने तीन सदस्यांची समिती स्थापन केली असून, १२ आठवड्यांच्या आत या समितीला अहवाल द्यायचा आहे. ही समिती जो निर्णय घेईल तो निर्णय मान्य असेल, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. समितीचा अहवाल यायला अजून बराच वेळ आहे, अशा वेळेला काय करायचं याबाबत आम्ही सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर; तसेच मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. 'विलीनीकरणाचा निर्णय समितीने राज्य सरकारला दिला तर तो आम्हाला मान्य असेल. पण तो निर्णय होईपर्यंत हा तिढा असाच कायम ठेवता येणार नाही. म्हणून सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे,' असे परब यांनी सांगितले. प्रस्तावीत वाढीनंतरचे वेतन - एक ते १० वर्षे या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, १२ हजार ८० रुपये असणारे मूळ वेतन १७ हजार ८० रुपये झाले आहे. ज्यांचे मूळ वेतन १७ हजार होते, त्यांना आता २४ हजार रुपये वेतन होणार आहे. ही वाढ ४१ टक्के एवढी आहे. - १० ते २० वर्षे या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात चार हजार रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे, ज्यांचे वेतन १६ हजार होते, त्यांचे वेतन आता २३ हजार ४० रुपये झाला आहे. - २० वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कामगारांना अडीच हजार रुपयांची वेतन वाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे, ज्यांचे मूळ वेतन २६ हजार रुपये होते आणि त्यांचे स्थूल वेतन ३७ हजार ४४० रुपये होते, त्यांचे पूर्ण वेतन आता ४१ हजार ४० रुपये झाले आहे. - तर, ज्यांचे मूळ वेतन ३७ हजार होते आणि स्थूल वेतन ५३ हजार २८० रुपये होते, त्यांचे मुळ वेतन आता ३९ हजार ५०० रुपये होईल, तर सुधारित वेतन ५६ हजार ८८० रुपये होईल. तिजोरीवर ३६० कोटींचा बोजा या पगारवाढीसाठी प्रत्येक महिन्याला ६० कोटींचा अतिरिक्त बोजा स्वीकारावा लागला असून त्यामुळे महिन्याला ३६० कोटी रुपयेचा बोजा राज्य सरकारवर पडणार आहे. यासाठी ७५० कोटी रुपये आम्हाला मोजावे लागणार आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कामगारांनी एसटी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अनिल परब यांनी या वेळी केले. कर्मचारी विलीनीकरणावर ठाम राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी ठाम असून त्याचे प्रतिबिंब आझाद मैदानात सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पुन्हा उमटले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली. मात्र, संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचे स्पष्ट करत आक्रमक स्वरुप धारण करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सविस्तर वृत्त ५ फोटोओळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप असला, तरीही शिवशाही बसची वाहतूक बुधवारीही सुरू होती. - स्वप्नील शिंदे


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZkcSJZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.