मुंबई : दिवाळी सुरू होण्यापूर्वी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पेटलेली ठिणगी अद्याप शांत झालेली नाही. मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं आक्रमक भूमिका घेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. 'राज्य सरकारने समिती समिती असा खेळ खेळू नये, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या एसटी कर्मचाऱ्यांचा मागणीवर ठोस निर्णय घ्यावा, यासाठी रविवारपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करत राज्यातील सर्व आगारात एसटी बंदचा निर्णय घेण्यात आला आहे,' अशी माहिती संघर्ष एसटी कामगार युनियनच्या शशांक राव यांनी दिली आहे. सध्या ११० आगार बंद असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. त्यातच आता राज्यातील सर्वच आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची घोषणा केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र करण्यात आल्याने दिवाळीनिमित्त गावी गेलेल्या प्रवाशांना परतीच्या मार्गात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकार या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रकरणी नेमकी काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qdZXEq