: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार दिवाळीनंतर थंडीत हळूहळू वाढ होणार आहे. मध्यंतरी बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे विदर्भात काहीसे ढगाळ वातावरण तयार झाल्याने तापमानात थोडीफार वाढ होती. परंतु, आता परत एकदा वातावरण कोरडे झाल्याने थंडीत वाढ होऊ लागली आहे. रविवारी नागपूर आणि गोंदिया येथे राज्यातील निच्चांकी १५.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. शहर आणि विदर्भात आता हळूहळू आल्हाददायक थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात घसरण होत आहे. रविवारी शहरात १५.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांच्या तुलनेत त्यात २.२ अंश सेल्सिअसची घट झाली होती. सरासरी तापमानाच्या तुलनेत हे तापमान ०.९ अंश सेल्सिअसनी कमी होते. नागपूर व गोंदियाखालोखाल विदर्भात अमरावती व ब्रह्मुपुरी इथं १६.२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. वाशिम येथे २० अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक किमान तापमान नोंदवले गेले. शहरातील वातावरण आता पूर्णपणे कोरडे झाले असल्याने पाऱ्यात घसरण होऊ लागली आहे. पुढील दोन दिवस शहरातील तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल , असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानंतर बुधवारपासून हळूहळू तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या काळात किमान तापमान हे सरासरी तापमानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसनी कमी असू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qbUGNP