मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केल्यामुळे चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Param Bir Singh) यांच्यावर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी पथकाने दोन पोलीस निरीक्षकांना अटक केली आहे. आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे अशी अटक केलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे असून खंडणीच्या गुन्ह्यात प्रथमच दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात दोन उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त आणि दोन निरीक्षकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार २२ जुलै रोजी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह अडचणीत; नेमकं काय आहे प्रकरण? बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर २२ जुलै रोजी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह, अकबर पठाण यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत शिंदे, संजय पाटील, निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, बांधकाम व्यावसायिक सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुनील जैन आणि संजय पुनमिया यांना याआधी पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी या गुन्ह्याचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी पथकाकडे वर्ग करण्यात आला. गुन्हा दाखल होताच यातील आरोपी पोलिसांची इतरत्र बदली करण्यात आली होती. जवळपास चार महिन्यांच्या तपासानंतर सीआयडीने पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या दोघांना अटक केली. परमबीर सिंह यांच्यावरील गुन्ह्यांमध्ये दोन पोलीस निरीक्षकांना अटक झाल्यामुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EVTORp