Type Here to Get Search Results !

'कंगनाबेनचं डोकं कशामुळं बधीर झालंय ते वानखेडेच शोधू शकतील'

मुंबई: देशाच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं अभिनेत्री (Kangana Ranaut) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भाजपच्या समर्थक असलेल्या कंगनावर देशभरातील राजकीय पक्षांनी एका सुरात टीकेची झोड उठवली आहे. मलाना क्रीमचा ओवरडोस झाल्यानं कंगना असं बडबडत असावी, अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली होती. त्यानंतर आज शिवसेनेनं (Shiv Sena) कंगनावर टीका करताना एका 'बाणात' दोन निशाणे साधले आहेत. '१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही तर भीक मिळाली. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ सालात मिळालं, असं धक्कादायक वक्तव्य कंगना राणावत हिनं केलं होतं. कंगना ही भाजपचं खुलेआम समर्थन करते. मात्र, पद्मश्री पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर तिनं स्वातंत्र्याबद्दल केलेल्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून अत्यंत तिखट शब्दांत कंगनाच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. वाचा: 'शिवसेनेनं राष्ट्रवाद, हिंदुत्व गहाण ठेवल्याचं वक्तव्य भाजपवाले करीत असतात. महाराष्ट्रातील सत्ता गमावल्याचा तो जळफळाट असतो; पण त्यांच्या कंगनाबेननं भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळ्यांवरच अफू–गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवलं आहे. मोदींचे राज्य हेच स्वातंत्र्य. बाकी सगळं झूठ, असं तिचं म्हणणं आहे. कंगनाबेनचं डोकं बधीर झालंय, असं वरुण गांधी म्हणतात. ते तसं कोणत्या कारणामुळं झालंय ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील,' असा टोला शिवसेनेनं हाणला आहे. 'कंगनाबेननं फोडलेल्या बॉम्बमुळं भाजपच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचा इतका भयंकर अपमान कधीच कोणी केला नव्हता. कंगनाला नुकताच ‘पद्मश्री’ सन्मान मिळाला. यापूर्वी हा सन्मान स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या वीरांना मिळाला आहे. त्याच वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनालाही अशा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं हे देशाचं दुर्दैव आहे. कंगनाबेन यांनी यापूर्वी महात्मा गांधींचाही अपमान केला. तिचं नथुरामप्रेमही उफाळून येत असतं. तिच्या बरळण्याकडं एरव्ही कोणी फारसं लक्ष देत नाही. एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात असं एकदा टिळक म्हणाले होते. कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान ततोतंत खरं ठरतं,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'वरुण गांधी यांनी कंगनाच्या भिक्कार वक्तव्याचा धिक्कार केला आहे. हा देशद्रोहच आहे असं वरुण गांधी सांगतात. अनुपम खेर यांनीही लाजत लाजत कंगनाचा निषेध केला आहे. पण भाजपमधील प्रखर राष्ट्रवादी अद्याप गप्प का आहेत?,' असा सवाल शिवसेनेनं केला आहे. कंगनाचे सर्व पुरस्कार परत घ्या! १९४७ साली स्वातंत्र्य मिळालंच नाही तर भीक मिळाली. पण या भीक मागण्याच्या प्रक्रियेत कंगनाचे सध्याचे राजकीय पूर्वज कोठेच नव्हते. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसंग्राम झाला. लाखो जणांनी त्याकामी बलिदान केले. जालियनवाला बागसारखे हत्याकांड ब्रिटिशांनी घडवून स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या रक्तानं न्हाऊन काढलं. रक्त, घाम, अश्रू आणि त्यागातून मिळालेल्या आमच्या स्वातंत्र्याला ‘भीक’ असे संबोधणं हा राष्ट्रद्रोहच आहे. अशा व्यक्तीस ‘पद्मश्री’ पुरस्कार देशाचे राष्ट्रपती देतात. त्या सोहळ्यास पंतप्रधान मोदी उपस्थित असतात आणि स्वातंत्र्यास भिकेची उपमा देणाऱ्या कंगनाबेनचे डोळे भरून कौतुक करतात. स्वातंत्र्य व क्रांतिकारकांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर या राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगनाचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wHWWxl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.