महेश महाले । नाशिकशहरात होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अवघा दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. मात्र या साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर नाशिक जिल्ह्यातील केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांचे नाव नाही. तसेच विरोधी पक्षनेते यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना संमलेनाचे निमंत्रण नसल्याने वाद निर्माण झाला आहे. महापौर यांनी आयोजकांच्या वर्तनावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. हा काही राजकीय आखाडा आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. नाशिक शहरात होणारे साहित्य संमेलन याआधी एचपीटी महाविद्यालच्या मैदानावर होणार होते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संमेलन पुढे ढकलण्यात आले होते. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर हे साहित्य संमलेन एचपीटी ऐवजी भुजबळ नॉलेज सीटी येथे हलविण्यात आले. त्यातच संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ आहेत. संमेलनाचे निमंत्रण देताना भाजपच्या नेत्यांना डावलण्यात आल्याची ओरड भाजपकडून केली जात आहे. तसेच हे साहित्य संमेलन राष्ट्रवादीने हायजॅक केले आहे का, असाही सवाल काही भाजपनं केला आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून केवळ महापौर सतीश कुलकर्णी यांनाच निमंत्रण पत्रिकेवर स्थान देण्यात आले आहे. त्यावर कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांची नावे टाकली जातात, परंतु भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे नाव देखील टाकले जात नाही. हे सर्व ठरवून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपच्या इतरही अनेक वरिष्ठ नेत्यांना पत्रिका देण्यात आली नसल्याने नाशिकचे महापौरांनी नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. भारती पवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नाशिक जिल्ह्याच्या आहेत, त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक आमदार व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आलेली नाहीत तर त्यांना साधे निमंत्रणही देण्यात आलेले नाही, असे सांगितले जात आहे. महापौर म्हणून मला निमंत्रण मिळाले आहे. जे जबाबदार लोक मला निमंत्रण पत्रिका देण्यासाठी आले होते, त्यांच्याकडेही मी नाराजी व्यक्त केली आहे, असे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले. पालिकेसह भाजप आमदारांची मदत तरीही महापालिका देखील साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये कुठेही मागे राहत नाही. २५ लाखांचा निधी देण्यात येऊन इतर सोयीसुविधा देण्यात येत आहे. याशिवाय ५० बसेस संमेलनस्थळी जाण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. साहित्यिकांच्या घरी विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. संमेलनस्थळी पालिकेचे दहा सफाई कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. आम्ही महापालिकेच्या माध्यमातून कुठेही कमतरता ठेवली नाही. तसेच, आमच्या पक्षाच्या आमदारांनीही साहित्य संमेलनासाठी निधी दिला आहे. एवढे करूनही आयोजकांनी भाजपवर एकप्रकारे अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आहे. नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे मी नाराज झालो आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील विविध नेत्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत असून त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र भाजपच्या नेत्यांना डावलण्यात आल्याचे दिसत आहे. फक्त आमच्या पक्षालाच टार्गेट करण्यात आल्याचे दिसत आहे. - महापौर सतीश कुलकर्णी
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DasYDO