आव्हाड यांची राष्ट्रवादी परिवार मेळाव्यात कबुली म. टा. प्रतिनिधी, ठाणेः राज्यात महाविकास आघाडी असली तरी येत्या निवडणुकीमध्ये आघाडी होईल की नाही हे सांगता येत नसल्याचे वक्तव्य राज्याचे गृहनिर्माणमंत्री यांनी केले आहे. लोकमान्य नगर-शास्त्रीनगर विभागातील राष्ट्रवादी परिवार मेळाव्याच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये त्यांनी ही कबुली दिली. राज्याच्या राजकारणात एकत्र असलो म्हणून बोलणारच नाही, हे जमणार नसल्याचा इशारा देत आवश्यक आहे तिथे विरोधात बोलणार असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या काळात झुंजायचे असून परिवार म्हणून एकत्र येऊन ठाण्यात राष्ट्रवादीची लाट आणण्याचे आवाहन आव्हाड यांनी केले आहे. ठाण्यातील लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा परिवार मेळावा नुकताच आर. जे. ठाकूर कॉलेजच्या मैदानात पार पडला. स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या मेळाव्यात करोना काळात कार्य केलेले कार्यकर्ते आणि करोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भाषणातून संकेत देण्याबरोबरच सत्ताधारी शिवसेना इशारा देण्याचा प्रयत्न केला. येणारा काळ कसा असेल हे माहीत नाही, आघाडी होईल की नाही, हे माहिती नाही. परंतु पुढील काळात अनेक प्रश्नांवर झुंजावे लागणार आहे, असे ते म्हणाले. रेमडेसिवीरचा साठा केल्याची कबुली करोना काळात रेमडेसिवीरचा साठा केल्याची कबुलीही या मेळाव्यातील भाषणामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी दिली. भेटणारे उद्योजक, व्यवसायिकांकडून मागणी करून रेमडेसिवीर एकत्र करून नागरिकांमध्ये वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील मोठे नेतेही फोन करून रेमडेसिवीरची मागणी करत होते. पक्षभेद विसरून त्याचा पुरवठा केल्याचाही खुलासा त्यांनी यावेळी केला. आपला वारसा आपले कार्यकर्ते पुढे नेतील. वडिलांच्या पुण्याईवर राजकारणात येणाऱ्या मुलांची राजकीय कारकीर्द फार यशस्वी होते असे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30AEk6p