अहमदनगर: जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगप्रकरणी अखेर पोलिसांनी स्वत:च फिर्याद देत अज्ञात व्यक्तींविरूद्ध सदोष मनुष्य वधाचा (कलम ३०४ अ) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. सरकारने चौकशी समिती नेमली असली तरी पोलिस याचा स्वतंत्रपणे तपास करून आरोपी निष्पन्न करणार आहेत. या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या देखरेखीखाली करण्याच्या सूचना पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिल्या आहेत. (ahmednagar hospital fire) शनिवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागली. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यासाठी जबाबदार कोण, हे निश्चित करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे. असे असले तरी विरोधीपक्ष आणि मृतांच्या नातेवाईकांकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. वाचाः या प्रकरणी फिर्याद देण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वत: होऊन याची दखल घेतली. तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर अहमद मुजावर यांनी यासंबंधी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपींविरूद्ध कलम ३०४ अ म्हणजेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास करून आरोपी निष्पन्न केले जाणार आहेत. दरम्यान, यासंबंधी विरोधपक्ष नेते यांनी केलेल्या ट्विटमध्ये पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे, 'भंडारासह राज्यात रूग्णालयातील आगीच्या अनेक घटना घडूनही सरकारने कोणताही धडा घेतलेला नाही. नगरच्या घटनेत पोलिसांनी जे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले, त्यात आग सीलिंगमधून सुरू झालेली दिसते. महापालिकेकडून फायर सेफ्टी प्राप्त नाही. वायरिंगबाबत इलेक्ट्रीकल अभियंत्याने दिलेल्या पत्राकडे दुर्लक्ष, हायड्रेशन आणि स्प्रिंकलर प्रणालीला आर्थिक मंजुरी आरोग्य आयुक्तांकडे काही महिन्यांपासून प्रलंबित असणे, अशी दुरवस्था आहे. त्यामुळे ११ निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. त्यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी. शेवटी कोणी जबाबदारी घेणार की नाही?' असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CVek3Y