Type Here to Get Search Results !

'या' दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

धुळे : हवामान विभागाने दिलेल्या अवकाळी पावसाचा इशारा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरा ठरला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुठे तुरळक तर कुठे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रात्री साक्री तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून या दोन जिल्ह्यात हवामानातील बदल पहायला मिळत आहे. तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसवरून १८ ते २० सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. त्यातच हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी करत असलेले शेतकरी चिंतेत सापडले होते. हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा इशारा फोल ठरावा अशी प्रार्थना शेतकरी करत होते. दुर्दैवाने अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोडपून काढले. भात, कांदा, कपाशी आणि फळबागा यांचे मोठे नुकसान या पावसाने केले आहे. या दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली असून तापमानाचा पारा २० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचला आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऐन थंडीत नागरिक उन्हाळा, पावसाळा अशा मिश्र ऋतूंचा अनुभव घेत आहेत. या अवकाळी पावसामुळे मात्र रब्बी हंगाम अडचणीत सापडला आहे. रब्बीच्या पेरण्या कराव्यात की नाहीत? असा प्रश्न आता शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CxuVtZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.