मुंबई: मानखुर्द येथील मंडाला भंगार बाजारातील गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवानं आगीत कोणी जखमी झालेलं नाही. मात्र, प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकलेलं नाही. पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १२ फायर इंजिन व १० टँकर्स घटनास्थळी पोहोचले आहेत. तब्बल १५० जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं दिली. हा परिसर गर्दीचा व दाटीवाटीचा आहे. आग इतरत्र पसरू नये म्हणून अग्निशमन दलाला काळजी घ्यावी लागत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HhVZ3K