Type Here to Get Search Results !

... म्हणूनच आर्यन खानला क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात अडकवले; शिवसेनेनं सांगितलं कारण

मुंबईः 'गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे साठे जप्त केले. पण पाव ग्रॅम, अर्धा ग्रॅम चरस पकडणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी टोळभैरवांच्या खिजगणतीत ते नसावे. उद्या हे लोक मुंबई- महाराष्ट्रातील पानपट्ट्या, पानाच्या गाद्यांवर धाडी घालून तंबाखू, सुपारी, बडीशोप वगैरे प्रकारांना चरस- गांजा ठरवून मोकळे होतील. नवाब मलिकांनी (Nawab Malik) याच खोटेपणावर हल्ला केला. शेतकरी आंदोलन, महागाईविरुद्धचा रोष यावरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठी म्हणे क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला (aryan khan) अडकवले,' असा आरोप शिवसेनेनं (Shivsena) केला आहे. महाराष्ट्रात सध्या नवाब मलिक विरुद्ध एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे असा सामना रंगला आहे. आता या वादात शिवसेनेनंही उडी घेतली आहे. शिवसेनेनं एनसीबीच्या कारवायांविरोधात सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. तसंच, भाजपवर शिवसेनेनं टीका केली आहे. 'फक्त महाराष्ट्रासारख्या राज्यात डेरा टाकून केंद्रीय तपास यंत्रणांनी सुरू केलेले नसते उद्योग हेच मोठे कारस्थान दिसते. या कारस्थानची किंमत चुकवावी लागेल. असे शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते सांगतात. त्यामागची संतप्त भावना हीच लोकभावना आहे. आर्यन खान प्रकरणात एका केंद्रीय तपास यंत्रणेचे थोबाड फुटले आहे. इतरांचेही लवकरच तसे होईल,' असा इशाराच शिवसेनेनं दिला आहे. 'एनसीबी हे महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करुन खंडणी, गाडी-घोडे उकळणारे टोळेभैरवच बनले होते. भाजपचे लोक या टोळभैरवांच्या खंडणीखोरीचे समर्थन करत होते. एनसीबीच्या टोळीचे कारनामे पुराव्यांसह समोर आणण्याचे चोख काम मंत्री नवाब मलिक यांनी केले. हे महाराष्ट्रावर मोठे उपकारच झाले. स्वतः मलिक यांच्या जावयावर याच टोळधाडीने खोटे गुन्हे दाखल करुन खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. फिल्मस्टार, त्यांची मुले, व्यापारी, राजकारण्यांचे नातेवाईक यांना अशा प्रकरणात फसवून खंडण्या उकळणाऱ्या केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात महाराष्ट्रात रोष निर्माण झाला आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'आर्यन खान प्रकरणात २५ कोटींच्या खंडणीचा विषय धक्कादायक आहे. एनसीबीचे अधिकारी पाव- दोन ग्रॅम चरस पकडून मोठाच तोरा दाखवत होते. पण त्यांची अनेक बाबतीत बनावटगिरी नवाब मलिक यांनी सिद्ध केली आहे. तेव्हापासून भाजपची वाचाच गेली आहे. ईडीने मुंबईत केलेल्या कारवाया व धरपकडी एनसीबी छापच आहेत,' असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nEIhAh

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.