: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. पद स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुख्याध्यापकाकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केल्यानंतर या अधिकाऱ्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सुहास अण्णाराव चेळेकर असं लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचं नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांनी राज्य सरकारच्या पती-पत्नी एकत्रीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यासाठी यातील आरोपी सुहास चेळेकर याने २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने जवळच्या रिक्त शाळेत मुख्याध्यापकपदी बदली होण्यासाठी अर्ज दिला होता. त्यानंतर कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार आल्यानंतर या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील आरोपीकडून तडजोडी अंती १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या प्रकरणात आरोपी लोकसेवक सुहास चेळेकर याला अटक केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D6My4D