मुंबईः १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, आता यावरुन पुन्हा एकदा राज्य सरकार व भाजप आमनेसामने आले आहेत. राज्य सरकारनं निर्णय घेण्याआधी केंद्राशी चर्चा करायला हवी होती, असं रेल्वे राज्यमंत्री यांनी म्हटलं आहे. दानवेंच्या या वक्तव्यावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. लोकल प्रवासाठी सर्वसामान्यांना क्यू-आर कोड पासची आवश्यकता भासणार आहे. दोन डोस घेतलेल्यांचा रेकॉर्ड सरकारकडेच आहे. सत्यता पडताळण्यासाठी रेल्वेकडे अशी कोणती यंत्रणा नाही. त्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा उभी करावी, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. यावरुन आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आधीच्या रेल्वे मंत्र्यांनी जबाबदारीने काम केलं होतं. मुंबईसाठी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सुचवल्याप्रमाणे त्यांनी केलं होतं. रावसाहेब दानवेंचा लसीकरणाला विरोध आहे का? त्यांचे राजकारण आहे की अकार्यक्षमता मला माहिती नाही. आतापर्यंत रेल्वेचे प्रशासन, मंत्री यांनी पूर्णपणे गेले दीड वर्ष सहकार्य केलं होतं आणि मला खात्री आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्री यात सहकार्य करतील,' असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसंच, 'आम्हाला कोणत्याही वादात जायचं नाही. रेल्वे आम्हाला सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे. आम्हाला श्रेयवादात पडायचं नाहीये. आम्हाला जनतेसाठी कामं करायची आहे. ज्यांना कोणाला श्रेय घ्यायचं आहे त्यांनी घ्यावे. मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचे सरकार श्रेयासाठी काम करत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. पालिकेकडून सर्टिफिकेट मिळेल आणि अॅपमध्ये नोंदणी होईल त्या लोकांना आपण परवानगी देतोय. लवकर अॅप तयार होईल, अशी माहितीही आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iwe57K