बुलडाणा : बुलडाणा शहर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र, या थंड हवेच्या शहराला पाणी टंचाईचं संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरण परिसरामध्ये आतापर्यंत कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढली नसून या धरणांमध्ये फक्त 25 टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा शहराला दोन ते अडीच महिने पाणी पुरेल एवढाच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दमदार पाऊस होऊन धरणाची पाणी पातळी वाढली नाही तर बुलडाणा शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी येळगाव धरण जून महिन्यातच १०० टक्के भरले होते. त्यामुळे यावर्षी पाणी पुरवठयात कुठेच कपात करण्यात आली नव्हती. यंदा मात्र, ऑगस्ट महिना आला असूनही बुलडाणा शहराला पाणी पुरवठा हा सध्या आठ दिवसाला सुरू आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात ४४ टक्के पाऊसाची नोंद झाली आहे.त्यामुळे येणाऱ्या दिवसात दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या काळामध्ये चांगलं पाऊस न झाल्यास बुलडाणा शहरासाठी पाणी टंचाई समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शहरातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CkaUYX