Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राच्या पुत्राने पटकावली 'चेवनिंग' शिष्यवृत्ती, वाचा राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ प्रवास

यवतमाळ : नेतृत्व विकासासाठी जागतिक स्तरावर दिल्या जाणाऱ्यां प्रतिष्ठीत अशा 'चेवनिंग' शिष्यवृत्तीसाठी येथील राजू केंद्रे या सामाजिक कार्यकर्ता विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शिष्यवृत्ती निवड मंडळाने राजूला शेवटचा प्रश्न विचारला, 'तुझी या स्कॉलरशिपसाठी निवड झाली नाही तर काय करशील? माझं नाही झालं तरी पुढच्या १० वर्षांत १० एकलव्य चेवनिंग स्कालर्स असतील असे उत्तर त्याने दिले. पण त्याच्या याच हुशारीने जगभरातील १६० देशातील एक हजार ३५०विद्यार्थ्यांमध्ये राजूची निवड झाली आहे. फॉरेन कॉमनवेल्थ विभागाच्या वतीने दिली जाणारी चेवनिंग शिष्यवृत्ती ब्रिटीश सरकारच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमातील महत्वाची आणि मानाची समजली जाणारी ही शिष्यवृत्ती आहे. जवळपास ४५ लाख रुपयांची ही शिष्यवृत्ती असून, इंग्लंडमध्ये शिकायला लागणारा सर्व खर्च पुरवते. या शिष्यवृत्तीसाठी १६० देशांमधील ६३ हजार अर्ज आले होते. त्यातील पाच हजार विद्यार्थ्यांनी दोन फेऱ्यांनंतर मुख्य मुलाखत दिली. त्यातून एक हजार ३५० विद्यार्थीची शिष्यवृत्तीकरीता अंतिम निवड झाली. मंगळवारी राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे याला ही शिष्यवृत्ती जाहीर झाली. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंप्री (खंदारे) हे राजू याचे गाव आहे. तेथे त्याचे आई-वडील शेती करतात. राजू केंद्रे याने यवतमाळच्या सावित्री ज्योतिबा समाजकार्य महाविद्यालात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करत असताना ‘एकलव्य अ‍ॅकेडमी नावाने शैक्षणिक चळवळ सुरु केली. मुख्यमंत्री फेलाशिपमध्येही त्याने यवतमाळ जिल्ह्यात अनेक पारधी बेड्यांवर काम केले. सध्या तो यवतमाळातून एकलव्य चळवळीद्वारे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना ना मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना सर्व प्रकारची मदत करतो. या विद्यार्थ्यांसाठी अडगळीतील पुस्तकं संकलन करून ती गरजूंना देण्याचा त्याचा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांना उपयोगी पडत आहे.ब्रिटनमध्ये शिकून परत मायदेशी येऊन काम करू पाहण्याऱ्यां नेतृत्वगुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती मिळविणारा राजू हा कदाचित पहिला असा विद्यार्थी असावा जो पदवीपर्यंत मराठी माध्यमात आणि पदवीनंतर मुक्त विद्यापीठातून शिकलेला आणिभटक्या प्रवर्गातून आलेला आहे. त्याने एक वर्षापूर्वी या शिष्यवृत्तीकरीता तयारी सुरू केली होती. आजपर्यंत त्याला जागतिक स्तरावरील १८विद्यापीठांच्या विविध मास्टर्स अभ्यासक्रमासाठी ऑफर आल्या आहेत. यातली बहुतेक विद्यापीठे आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार पहिल्या २०० मधील आहेत आणि नऊ विद्यापीठे पहिल्या १०० मधील आहेत. या विद्यापीठांत मास्टर्सचे शिक्षण पूर्ण करायला वर्षाला जवळपास ४० लाख रुपये लागतात. या शिष्यवृत्तीमुळे राजू केंद्र याला यापैकी कोणत्याही विद्यापीठात शिक्षण घेता येणार आहे. परदेशातून शिक्षण घेऊन परतल्यानंतर आपल्यासारख्या अभावाचे जगणे जगणाऱ्यां आणि शैक्षणिक संधी नसणाऱ्यां विद्याथ्र्यांना अशा शिष्यवृत्तींच्या माध्यमातून परदेशात शिक्षणासाठी पाठविण्याचा निश्चय केला असल्याचे राजू केंद्र याने सांगितले. राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ हा प्रवास संघर्षातून पुढे जाणाऱ्यां विद्याथ्र्यांसाठी प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया त्याचे यवतमाळ येथील मार्गदर्शक प्रा. घनश्याम दरणे यांनी व्यक्त केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Asx2PB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.