सोलापूर: मराठा आरक्षणप्रश्नी आज सोलपुरात काढण्यात आलेल्या मराठा आक्रोश मोर्चाला राजकीय रंग आला आहे. या मोर्चाचे संयोजक आमदार नरेंद्र पाटील यांनी सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चा हा सरकारने पोलिसांच्या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळं आता मराठा आरक्षणप्रश्नी पुन्हा एकदा सरकार विरुद्ध विरोधक असे चित्र उभे राहिले आहे. सध्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी सोलापूरात कडक विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांची परवानगी नसतानाही मराठा आंदोलकांनी हा मोर्चा काढला आहे. त्यामुळं पोलिसांकडून मोर्चा थोपविण्याचा प्रयत्न सुरू असून शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पोलीस यंत्रणेकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना जागोजागी रोखण्याचा प्रयत्न होत असल्याने मोर्चाला होणाऱ्या गर्दीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. वाचाः मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निघालेला हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याच्या चर्चेने मराठा समाजाने या मोर्चाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळं आंदोलनस्थळी संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. असं असलं तरीही ११ वाजता मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर आमदार नरेंद्र पाटील ठाम आहेत. कांहीही असो मोर्चाला या असं आवाहन पाटील यांनी समाजबांधवांना केलं आहे. या सर्व परिस्थितीच्या आढावा घेत सरकारने मराठ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार नरेंद्र पाटील यांनी केला आहे. वाचाः दरम्यान, या मोर्चाला येणाऱ्या मराठा नागरिकांना ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत टेंभुर्णी येथे रोखण्यात आल्याने. संतप्त मोर्चेकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळं पुणे-सोलापूर -हैद्राबाद महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पर्यायाने हैद्राबाद, चेन्नई, बेंगलोर अशी दक्षिण भारताकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ABVNt0