चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथे वाशिष्टि नदीवरील जुन्या पुलाच्या पाण्या खालील सर्व्हे ऑडीटचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रीय चौपदरीकरण खत्याकडून ही टीम सर्व अत्याधुनिक साधन सामग्रीसह दाखल झाली आहे. दरम्यान, नव्याने सुरू असलेल्या पुलाचे काम तात्काळ १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टिमुळे आलेल्या महापुरात पुलाचा काही भाग कोसळल्याने वाहतूक बंद करावी लागली. त्यानंतर भराव घालून यावरून हलकी वाहनांची वाहतूक सध्या सुरू आहे. अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या सगळ्याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून घेण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. दोन दिवसांपासून वाशिष्टिवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाचे पाण्याखालील सर्व्हे ऑडिट सुरू आहे. हे काम पूर्ण होऊन या ऑडिटच्या सर्व्हे अहवालानंतरच जून्या पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतूकीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी दिली आहे. यासाठी एक्सपर्टच्या टीमकडून घटनास्थळी सर्व्हे सुरू आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीशी लढून वारंवार उभे राहिलेले चिपळूण शहर या महापुरातूनही सावरू लागले आहे. पुढील १५ दिवसांत हे शहर पुन्हा उभे राहील, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने देखील प्राधान्याने शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष पुरविले आहे. आजपर्यंतच्या इतिहासात कधीही न घडलेल्या या महापुरामुळे संपूर्ण चिपळूण तालुका हादरला आहे. यातून बाहेर येताना शहरात कोणतीही रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आल्याचे चिपळूणचे प्रांत प्रवीण पवार यांनी सांगितले. या महापुरात तब्बल चार वर्षांचा कचरा एका दिवसात जमा झाला आहे. हा कचरा उचलणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VjNj9B