म. टा. विशेष प्रतिनिधी, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन होणे ही बाब महाविकास आघाडीच्या स्थैर्यासाठी अनुकूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना आशीष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर आणि अतुल भातखळकर या मुंबईतील भाजपच्या शिलेदारांचे निलंबन झाल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रशासकीय आणि संवैधानिक कामकाजात भाग घेता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे १०६ आमदार आहेत. महाराष्ट्रात बहुमतासाठी आवश्यक असणारा जादुई आकडा १४५ आहे. म्हणजेच भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ ३९ आमदारांची गरज होती. भाजपव्यतिरिक्त इतर १० आमदार भाजपला पाठिंबा द्यायला तयार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उरलेले आमदार फोडून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्यात सुरू होती. मात्र आता १२ आमदारांचे निलंबन झाल्यामुळे हे स्वप्न अपुरे राहिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yqpaMN