सातारा : राज्यात करोनाचा धोका काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशात आता साताऱ्यामध्येही लॉकडाऊन कायमच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. करोनाची रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत लॉकडाऊन कायम राहिल आणि नियमांची अंमलबजावणी देखील केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यासंबंधी जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्वच विभागाची आढावा बैठक बोलावली. त्यावेळी त्यांनी साताऱ्याच्या लॉकडाऊनविषयी माहिती दिली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव व जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार लॉकडाऊन कालावधीत वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा याकाळात बंद राहणार आहेत. दरम्यान, राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन १४ एप्रिलपासून लॉकडाऊनसारखे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. या निर्बंधांनंतरही बाजारातील गर्दी कमी होत नसल्याने आठवडाभरातच निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. गेल्या दीड महिन्यांपासून हे निर्बंध लागू असून सर्व बाजारपेठा, आस्थापना व अन्य व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे नोकरदार व व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यात आता १ जूननंतरही लॉकडाऊन कायम आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36sALz7