मुंबईः'कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल. पण आमची भांडी काचेची नाहीत. ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही, असा विश्वास यांनी व्यक्त केला आहे. तसंच, महाविकास आघाडीत अंतर्गंत वाद असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला आहे. संजय राऊत आज मुंबईत प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. तर, काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर उघडपणे टीका केली आहे. या दोन मुद्द्यांवरुन महाविकास आघाडीत अंतर्गंत वाद असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसंच, देशातील करोना परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. 'जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तो राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडीतील महत्त्वाचे मंत्री, अनुभवी नेते आहेत. त्यांनी काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. कॅबिनेटमध्ये काय घडलं हे बाहेर सांगू शकत नाही. बाहेर कितीही कोणी अफवा पसरवल्या तरी महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे,' असं विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. देशात महाराष्ट्र मॉडेल लागू करावं 'देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार, पंतप्रधान आणि देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगत देशात महाराष्ट्र मॉडेल लागू केलं पाहिजे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण आहेत. पण, उत्तम प्रकारे नियंत्रण मिळवलं जात असून आरोग्य सुविधा पुरवण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्याचं कौतुक देश नाही तर जगभरात सुरु आहे. सगळीकडे महाराष्ट्राची पाठ थोपटली जात आहे,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 'देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरु आहे. ज्या पद्धतीने गंगा, यमुनेत प्रेतांचा खच पडला आहे. मृतदेह वाहून येत किनाऱ्यावर लागली आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करता येत नाही. हे असं याआधी देशात कधी घडलं नव्हतं,' अशी खंतही राऊतांनी व्यक्त केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eLuYK0