विजयसिंह होलम । भाजप-शिवसेना युतीच्या काळात जलसंपदा मंत्री राहिलेले (Girish Mahajan) यांनी ज्येष्ठ समाजसेवक (Anna Hazare) यांची अचानक भेट घेतली. युती सरकारच्या काळात हजारे यांची आंदोलने मिटविण्यासाठी महाजन यांनीच वेळोवेळी मध्यस्थाची भूमिका बजावली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर आरोप केले. हे सरकार आंदोलकांशी संवाद ठेवत नसल्याने आंदोलने चिघळत असल्याचा आरोप महाजन यांनी केला. हजारे अलीकडेच उपचार घेऊन परतले आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी महाजन आले होते. पूर्वी महाजन वेळोवेळी राळेगणसिद्धीत येत होते. तत्कालीन राज्य सरकारचे नव्हे तर केंद्र सरकारसोबतही हजारे यांचा संवाद साधून देण्याचे काम त्यांनी केले होते. बहुतांश वेळा त्यांची ही मध्यस्थी यशस्वी होऊन हजारे यांची आंदोलने टळली किंवा मागे घेण्यात आली होती. मधल्या काळात राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर महाजन राळेगणसिद्धीत आले होते. वाचा: हजारे यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘राज्यात महिनाभरापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सरकारला मिटवता येत नाही, हे सरकारचे अपयश आहे. भाजप-शिवसेनेचे सरकार असताना मराठा क्रांती मोर्चाची आरक्षणासाठीची आंदोलने, ओबीसींची आरक्षणासाठी आंदोलने, नाशिकहून निघालेला शेतकरी मोर्चा अशी अनेक आंदोलने झाली. मात्र, त्या त्यावेळी आम्ही सरकार म्हणून आंदोलकांशी संवाद साधत होतो. त्यांना भेटून चर्चा करत होतो. अशा अनेक प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. आंदोलकांशी चर्चा करून आम्ही त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणायचो. सर्वपक्षीय चर्चाही केली जायची, त्यामुळे आंदोलने हाताळणे सोपे जात होते. आता मात्र महाविकास आघाडीचे सरकार आंदोलकांशी काही देणेघेणे नाही, अशा पद्धतीने वागत आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे,’ असेही महाजन म्हणाले. वाचा: महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. या तिघांचा परस्परांशी ताळमेळ नाही. अनेक मंत्री चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. अगर राजीनामे घेतले जात नाही. आमच्या सरकारच्या काळात अशा परिस्थितीत मंत्र्यांनी तत्काळ राजीनामे दिले होते. हे सरकार पाच वर्षे टिकेल की नाही, हे माहिती नाही, मात्र राज्यात जे काही सुरू आहे त्यामुळे राज्याचे खूप मोठे नुकसान होत आहे. सध्या कोणतीही नवी कामे सुरू नाहीत. जुन्या कामांवरून भांडणे सुरू आहेत. कोणत्या प्रकल्पाला कोणाचे नाव द्यायचे यावरून वाद सुरू आहेत. त्यामुळे हे सरकार किती काळ टिकेल यापेक्षा अशाच पद्धतीने काम सुरू राहिले तर राज्याचे मोठे नुकसान होईल, हा मुद्दा महत्वाचा आहे,’ असेही महाजन म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3psHgLk