औरंगाबाद : सैराट हा सिनेमा आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. असाच एक भयंकर प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. प्रेमविवाह केला म्हणून राग मनात धरत सख्या भावाने सोबत आणलेल्या कोयत्याने सपासप वार करत बहिणीचं शिर धडावेगळे केलं. अंगावर शहारा आणणारी ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात घडली असून, याप्रकरणी हत्या करणाऱ्या अल्पवयीन भाऊ आणि आई दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील अविनाश थोरे व नगिनापिंपळगाव येथील किर्ती मोटे या दोघांनी २१ जून २०२१ रोजी प्रेमविवाह केला. मात्र या प्रेमविवाहाला किर्तीच्या कुटुंबातील सदस्यांचा विरोध होता. पण काही काळ उलटल्यानंतर काही सर्व काही सुरळीत होईल असे किर्तीला वाटत असतानाच ती राहत असलेल्या लाडगाव शेतवस्तीवर तिचा भाऊ आणि आई शोभा मोटे भेटायला आले. यामुळे आई आणि भाऊ भेटायला आल्याने कीर्तीने आधी पाणी दिले आणि नंतर चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. कीर्ती किचनमध्ये जाताच तिचा भाऊ सुद्धा तिच्या मागे किचनमध्ये गेला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने थेट वार करत बहिणीच शिर धडावेगळे केलं. तो एवढ्यावरच थांबला नाही तर शिर हातात घेऊन घराच्या ओट्यावर आला आणि उपस्थित लोकांना शीर दाखवत 'हीचं काय केलं पहा' असं म्हणू लागला. त्यानंतर काही वेळात दोघेही आई आणि मुलगा तेथून निघून जात त्यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती दिली. म्हणून अविनाश वाचला..! किर्तीची हत्या केल्यानंतर अल्पवयीन आरोपी अविनाशच्या खोलीत गेला. आजारी असल्याने अविनाश झोपलेला होता. मात्र, किर्तीच्या आवाजाने तो उठला होता. तेवढ्यात समोर कोयता घेऊन किर्तीची भाऊ उभा असल्याचे पाहून अविनाशने कोयत्याचे वार वाचवत तेथून पळ काढला. त्यामुळे अविनाशचा जीव वाचला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31v7MvB