Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यात सहा आगारात बस सेवा सुरू; ११ संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन

: संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर सांगली जिल्ह्यात प्रशासनाकडून कारवाई सुरूच आहे. आवाहन करूनही कामावर न आलेल्या ११ कर्मचाऱ्यांचं प्रशासनाने निलंबन केलं, तर एका कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. सोमवारी जिल्ह्यातील मिरज, सांगली, जत, तासगाव, विटा आणि इस्लामपूर आगारातून एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची लालपरी १४ दिवसांनी सांगलीच्या रस्त्यांवर धावली. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं, या मागणीसाठी राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. संपामुळे एसटीच्या प्रवासी सेवेवर परिणाम झाला आहे. खासगी वाहनांतून काही मार्गांवर प्रवासी वाहतूक सुरू आहे, तर काही आगारातून एसटीच्या ठराविक फेऱ्या सुरू करून प्रवाशांची सोय करण्याचा प्रयत्न महामंडळाने केला आहे. एसटीच्या फेऱ्या वाढवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सोमवारी सांगली जिल्ह्यातील सहा आगारातून ठराविक मार्गांवर एसटी सेवा सुरू करण्यात आली. मर्यादित स्वरूपात का असेना, पण एसटी सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, संपात सहभागी झाल्याबद्दल प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील १८ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे, तर २७६ जणांना निलंबित केलं आहे. तसंच रोजंदारीवरील २६८ जणांना सेवासमाप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. एसटीच्या विविध आगारातून फेऱ्या सुरू करण्यासाठी चालक कम वाहक अशा नवीन २७ जणांना नियुक्ती दिली आहे. त्यांच्यामार्फत काही मार्गावर फेऱ्या सुरू केल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातल्या जत आगारातून सहा, तासगाव चार, विटा दोन, मिरज शहरी बसेस १०, मिरज-पुणे शिवशाही पाच, सांगली-पुणे शिवशाही पाच, इस्लामपूर तीन आणि इस्लामपूर स्थानिक पातळीवर १३ बसेसच्या फेऱ्या दिवसभरात करण्यात आल्या.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cEoJpq

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.