मुंबई: केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा मारा सुरू आहे. देशभरातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेनंही ही संधी साधत नेहमीच्या शैलीत भारतीय जनता पक्ष व त्यांच्या समर्थकांवर घणाघाती हल्ला चढवला आहे. (Shiv Sena Slams BJP in over ) शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्राच्या निर्णयाचं विश्लेषण करताना सरकारवर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. '१३ राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यातून आलेलं हे शहाणपण आहे. शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यापुढं पांढरं निशाण का फडकविलं?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेणं अखेर केंद्र सरकारला भाग पडलं आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झालाच आहे. मागे हटणार नाही असं सांगणाऱ्यांचा अहंकार पराभूत झाला, पण आताही अंध भक्त बोलतील, 'काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक' असा टोला शिवसेनेनं हाणला आहे. वाचा: प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना त्यांच्या हिताबाबत स्पष्टीकरण देऊ शकलो नाही, असं पंतप्रधान मोदी कायदे मागे घेण्याची घोषणा करताना म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही शिवसेनेनं समाचार घेतला आहे. 'शेतीचं खासगीकरण, कंत्राटीकरण देशातील शेतकऱ्यांनी मान्य केलं नाही. कारण भाजपच्या मर्जीतील एखाददुसऱ्या उद्योगपतीसाठीच हे तीन कृषी कायदे आणले गेले अशी देशवासीयांची भावना झाली. देशातील सर्वच सार्वजनिक उपक्रम विकण्यात आले. विमानतळं व बंदरंही भांडवलदारांच्या हाती गेली. एअर इंडियाचंही खासगीकरण झालं आणि सरकार त्याच उद्योगपतींसाठी शेतीचं कंत्राटीकरण, खासगीकरण करायला निघालं होतं. हा जुलूम आहे. आपला देश लोकशाही प्रक्रियेतून बाहेर पडून संपूर्ण खासगीकरणाच्या जोखडात जात आहे. ‘संपूर्ण स्वातंत्र्यातून स्वातंत्र्याचं संपूर्ण खासगीकरण व लोकशाहीचं मालकीकरण’ असा नवा अध्याय लिहिला जात आहे. दोन-चार लोकांच्या अहंकारातून देशाची प्रतिष्ठा रसातळाला जात आहे,' असा आरोप शिवसेनेनं केला आहे. ‘महाभारत आणि रामायणात शेवटी अहंकाराचाच पराभव झाला हे सध्याचे नकली हिंदुत्ववादी विसरले व त्यांनी रावणाप्रमाणे सत्य व न्यायावरच हल्ला केला. पण शेतकरी लढत राहिले, शहीद झाले व शेवटी जिंकले. निदान यापुढं तरी असे कायदे आणण्यापूर्वी केंद्र सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा. सर्व विरोधी पक्ष, संबंधित संघटना यांना विश्वासात घ्यावं आणि देशहिताचा विचार करावा. लखीमपूर खिरी इथं आंदोलक शेतकऱ्यांना भाजपच्या मंत्रिपुत्रानं चिरडून मारलं. त्या ‘जालियनवाला बाग’सारख्या हत्याकांडाविरुद्ध सार्वत्रिक बंद पुकारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं. न्याय, सत्य आणि राष्ट्रवादाच्या लढाईत महाराष्ट्रानं नेहमीच निर्भय भूमिका घेतली. यापुढेही अशी भूमिका घ्यावीच लागेल,' असंही शिवसेनेनं नमूद केलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oL7BUv