: लग्न लावून देण्यासाठी बाप उशीर करत असल्याच्या रागातून लेकाने बापाची कुऱ्हाडीचे वार करून हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथे घडला. धर्मा भारती असं खून झालेल्या वडिलांचं नाव असून प्रमोद भारती असं आरोपी मुलाचं नाव आहे. आरोपी प्रमोद भारती हा व्यसनी असून वडिलांशी लग्नाच्या कारणावरून नेहमी वाद घालायचा. याच मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर आरोपीने वडिलांवर कुऱ्हाडीचे वार केले. या हल्ल्यात धर्मा भारती हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या हत्या प्रकरणानंतर गावात एकच खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपास केला असता पोटच्या मुलानेच बापाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. २७ वर्ष वय झालं असूनही वडील लग्न लावून देत नसल्याने प्रमोद भारती याने वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची माहिती जऊळका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांनी दिली आहे. दरम्यान, आरोपी मुलगा प्रमोद भारती याच्याविरुद्ध ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास जऊळका पोलीस करत आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wmQHyO