सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात दिवाळी काळात २१० टन कचरा गोळा करण्यात आला आहे. मनपाचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचा-यांनी दिवाळीतही कार्यरत राहून कचरा संकलन केले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी रात्रपाळीत काम करीत कचरा उठाव करून शहर चकाचक केले. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवाळी काळात तिन्ही शहरे ही कचरामुक्त राहावीत, अशा सूचना आयुक्त कापडणीस यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या होत्या. यानुसार आरोग्य विभागाने दिवाळी काळात रस्त्यावर पडणारा कचरा संकलन करण्यासाठी विशेष नियोजन केले होते. यामध्ये आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्दर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, डॉ रवींद्र ताटे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अनिल पाटील यांनी नियोजन केले. दिवाळी काळातील कचरा उठावासाठी १० वाहने, ५० कर्मचारी, ०७ मुकादम, ०४ स्वच्छता निरीक्षक, ०१ वरीष्ठ स्वच्छता निरीक्षक यांनी दिवसा व रात्रीच्या सत्रात तिन्ही शहरातील कचरा उठाव केला. या संपूर्ण काळात सांगली शहरातून १२० टन, मिरजेतून ५० टन तर कुपवाडमधून ४० टन असा एकूण २१० टन कचरा संकलित करण्यात आला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांनी रात्र पाळीत काम करून शहर चकाचक केले. अजूनही व्यावसायिक दुकानासमोर लावलेल्या नारळाच्या झावळ्या, केळीचे खुंट आणि हार संकलन करण्याचे काम सुरू असून, अंदाजे ५० टन कचरा गोळा होणार आहे, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. -
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CQPwu2