: एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं, या मागणीवर एसटी कर्मचारी अद्यापही ठाम आहेत, तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावं, अशी भूमिका घेत एसटी प्रशासनाने आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सेवा समाप्तीच्या नोटिसा देऊनही कामावर हजर न होणाऱ्या जत डेपोतील पाच कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. एसटी प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे आंदोलक कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबरपासून राज्यातील विविध आगारांत कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला आहे. या संपाला अनेक आगारांतून पाठिंबा मिळत गेला. त्यानंतर ८ नोव्हेंबरपासून सांगलीतील एसटी कर्मचारी संघटना कृती समितीही यात उतरली. त्यामुळे जिल्ह्यातील बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना आश्वासन देऊनही कर्मचारी आंदोलन मागे घेत नसल्याने अखेर संपात सहभागी झाल्याबद्दल कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. सांगली विभागात आतापर्यंत २५८ जणांना निलंबित करण्यात आलं आहे. मंगळवारी संपात सहभागी झालेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीवरील २६८ कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर हजर राहण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटिसा मिळाल्यानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. अखेर गुरुवारी रात्री कारवाईचा बडगा उगारत पाच कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. महामंडळाच्या या दणक्याने जिल्ह्यातील आंदोलक कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3x93dlT