कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून बुधवारी सकाळी सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सकाळी कामांवर जाणाऱ्यांची त्रेधातिरपीठ उडाली. पावसाचा फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरांना बसला असून कापणी केलेले भात ठिकाणी अनेक भिजले आहे. गेले आठवडाभर जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी पडत आहेत. बुधवारी सकाळी पासून ढगाळ हवामान असल्याने हिवाळ्यातही पावसाळ्याचा भास होत होता. सकाळी साडेआठ वाजता रिमझिम पावसास सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी शाळा, क्लासेसला जाणारे विद्यार्थी, नोकरदार मंडळींना छत्र्या, रेनकोटचा आधार घ्यावा लागला. अर्धा तास पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. गेले आठवडाभर पावसाचा फटका गूळ आणि साखर हंगामाला बसला आहे. पावसामुळे ऊस तोडणी थांबली असल्याने त्याचा परिणाम साखर कारखाने आणि गुऱ्हाळघरांना बसला आहे. चंदगड, आजरा भागात कापून ठेवलेले भात पीक भिजले आहे. तसेच शेतात पाऊस झाल्याने घात येण्यास उशीर होणार असल्याने ऊस लावणीस विलंब होणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rd8gAO