म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईत येणाऱ्या अमली पदार्थांचा संबंध नांदेडशी असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी एनसीबीच्या मुंबई संचालनालयाने नांदेडमध्ये तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. मुंबईत येणारे अमली पदार्थ नांदेड जिल्ह्यातील कामथा येथे तयार होत असल्याची गुप्त माहिती एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने तेथील एका घरावर छापा टाकला. त्यावेळी तेथे घरातच अमली पदार्थ तयार होत असल्याचे दिसून आले. खसखशीचा भूसा व अफूच्या बिया यापासून हे अमली पदार्थ तयार होत होते. त्यानुसार छाप्यादरम्यान ११२ किलो खसखशीचा भूसा व १.४० किलो अफूच्या बिया जप्त करण्यात आल्या. या सामग्रीपासून अमली पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या मिक्सरचा उपयोग केला जात होता. असे दोन मिक्सरदेखील ताब्यात घेण्यात आले. त्याखेरीज १.५५ लाख रुपयांची रोख व तीन नोटा मोजण्याची यंत्रेदेखील हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी एनसीबी मुंबईने गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. तसेच पुढील तपास सुरू आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r5o8pe