अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर तालुकाच्या अंतर्गत येणाऱ्या परतवाडा येथे सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास किरकोळ वादातून निखिल मंडले या युवकावर एकाने चाकूने प्राणघातक हल्ला () केला. या हल्ल्यात निखिल मंडले याचा मृत्यू झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विकी धाडसे असं खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. परतवाडा शहरातील महावीर चौकात निखिल मंडळे आपल्या कामात व्यस्त असताना विकी धाडसे या युवकाने अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात निखिल गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, निखिल व विकी हे एकमेकांना ओळखत असून हा खून वैयक्तिक वादातून झाला असल्याची माहिती परतवाडाचे ठाणेदार संतोष टाले यांनी दिली. जिल्ह्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात बैठक घेतली. महावीर चौकातून साडे सात वाजताच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा सुद्धा गेला. मात्र त्यानंतर काही क्षणातच हा खून झाल्याच्या चर्चेने शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, वैयक्तिक वादातून हा खून झाला असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी खुनाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या हत्येप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DlJBgX