बारामती : 'काल कर्जत जामखेडला गेल्यानंतर तिकडे कोणीच मास्क वापरत नव्हतं. आमचा रोहितच वापरत नव्हता. रोहितला म्हटलं, अरे शहाण्या तू आमदार आहेस. तूच मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही अन् लोक मास्क वापरत नाही. हे बरोबर नाही' असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जर तिसरी लाट आली तर त्याची मोठी किम्मत मोजावी लागेल. त्यामुळे टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशारा दिला अजित पवार यांनी दिला आहे. बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी करोनाबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. काल कर्जत जामखेडमधील कार्यक्रमाचं उदाहरण देताना त्यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्याचवेळी सर्वांनी दोन डोस घेण्याचं आवाहन करत लसीकरण मोठ्या प्रमाणात करा अशा सुचनाही प्रशासनाला दिल्या. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन डोस असतील तरच कोणतंही काम मार्गी लागेल अशी भूमिका घेतली. असा टोकाचा निर्णय घ्यायला भाग पाडू नका असाही इशारा दिला आहे. आता तुम्ही म्हणाल काही होत नाही. करोना गेला आहे. पण करोना परत आल्याचंही समजणार नाही. त्यामुळं सावधगिरी बाळगा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YHUF8S