बुलडाणा : रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस उजाडला असला तरी आंदोलनाच्या आदल्या दिवशीपासून तुपकर उपाशी आहेत. त्यांचे शुगर व ब्लड प्रेशर प्रचंड कमी झाले आहे. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप आंदोलनासंदर्भात कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. काल रात्री ९ वाजता त्यांची तपासणी करण्यात आली होती. मात्र आज सकाळी त्यांची तब्येत एकाएकी खालावली. पोटात अन्नाचा कणही नसताना सातत्याने कार्यकर्त्यांशी, शेतकऱ्यांशी ते काल मध्यरात्रीपर्यंत संवाद साधत होते. अशक्तपणा वाढत असल्याने त्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचाराची गरज भासू शकते. मात्र तुपकर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटण्याच्या मनःस्थितीत नसल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढत चालली आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी आता आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. हा लढा उभारणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर नागपुरातील संविधान चौकात अन्नत्याग सत्याग्रहाला बसले होते. मात्र पोलिसांनी अटक करून त्यांना बुलडाण्यात आणले. आता त्यांचा सत्याग्रह बुलडाण्यात सुरू झाला आहे. त्यामुळे आता शेतकरी व कार्यकर्ते आक्रमक होत ठिक-ठिकाणी रास्तारोको करण्यात आला यात बुलडाणा जिल्ह्यातील अनेक महामार्गावर वाहतूक कोंडी औरंगाबाद-अमरावती, औरंगाबाद - नागपूर,बुलडाणा - अजिंठा, बुलडाणा - अकोला, बुलडाणा- चिखली, बुलडाणा- मलकापूर महामार्गा शेतकरी व कार्यकर्त्यांनी अडवले. विदर्भ-मराठावाड्यात आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fuv2bA