जालनाः जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी येथे पोटच्या मुलानं जन्मदात्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. तर, सातऱ्यातही किरकोळ कारणावरुन स्वतःच्याच आईचा खून केल्याची घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसै शिल्लक नसल्यानं घरातील गहू, तांदूळ विकायचे आणि दारू प्यायची यासाठी सखाराम शिंदे हा तरूण सकाळी गहू तांदूळ घेऊन निघाला होता. तेवढ्यातच आईने गहू- तांदूळ नेऊ नकोस आपल्याला घरी खाण्यासाठी काहीच उरणार नाही, असा आरडाओरडा चालू केला. आईनं अडवल्याचा राग मनात धरुन आरोपीनं वेळूच्या काठीने आईला मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्या मातेच्या डोक्यात मार लागल्याने शेजारील लोकांनी त्यांना आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. आरोपीच्या वडीलांनी आष्टी पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली त्यानुसार आरोपी सखाराम शिंदे यांच्या विरुद्ध भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे किरकोळ कारणावरुन स्वतःच्या आईचा खून करुन मुलगा पोलीस ठाण्यात हजर झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे साताऱ्यातील रहिमतपूर येथे घडली आहे. सुलाबाई पवार (वय ६५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शहाजी पवार असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील बसस्थानक परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुलाने धारधार शस्त्राने आईचा खून केला. त्यानंतर मुलगा स्वतः रहिमतपूर पोलीस ठाण्यात हजर झाला असून, त्याने पोलिसांना मी रागाच्या भरात माझ्या आईचा खून केला आहे, अशी कबुली दिली आहे. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rXJUcK