सांगली : करोना रुग्णांची संख्या कमी होताच मुंबईत लोकल ट्रेन सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन लोकल सेवा लगेच सुरू होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी निर्बंधांचे पालन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. यानुसार सर्व खासगी आस्थापनांनी वेळांचे नियोजन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सांगलीत पुराने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. मुंबईतील लोकल ट्रेनबाबत ते म्हणाले, लोकल सेवा लगेच सुरू होणार नाही. नागरिकांचे जीव वाचविणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. राज्यात आज १२५० ते १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन आपण दररोज उत्पादन करतो. पण मध्यंतरी ऑक्सिजनचा तुटवडा होता. पुढची जी लाट आहे त्यात केंद्राने देखील आपल्याला निर्देश दिले आहेत. या संभाव्य लाटेत दुपटीपेक्षा जास्त ऑक्सिजन लागेल. मला विनंती करायची आहे की, प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क वापरावा. रुग्ण वाढ कमी होत नाही तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवतो आहोत. सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांना कामाच्या वेळा विभागण्याची विनंती आहे. वर्क फ्रॉम होमचे नियोजन करा. उद्योगांना शक्य आहे तिथे बायो बबलचा अवलंब करावा. आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल याचा विचार करावा.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fk0Rcc